Saturday, March 19, 2011

मी वर्षात एक परिवर्तन घडवणारच....!


मी वर्षात एक परिवर्तन घडवणारच....!
असा दृढ निश्चय आपण करू शकतो??
एका अधिकाऱ्याचा गैर कारभार उघडकीस आणला...
एका सरकारी ऑफिस मध्ये चालू सावळा गोंधळ थांबवला...
एका शासकीय विभागाला मदत करून त्यांच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ केली...
एका चुकीच्या सरकारी धोरणाला विरोध करून ते बदलणे सरकारला भाग पाडले..
एक योग्य आणि आवश्यक असा धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यायला लावला...
एक तरी परिवर्तन मी या वर्षात घडवले...!! आणि पुढच्या वर्षातही किमान एक परिवर्तन मी घडवणारच...!!

३६५ दिवसांमध्ये केवळ एका परिवर्तनाची जबाबदारी आपल्यातला प्रत्येक जण घेऊ शकत नाही????

आणि याला जर तुमचे उत्तर नकारार्थी असेल तर भारत २०२० मध्ये महासत्ता बनल्याचे स्वप्न पहायचा तुम्हाला अधिकार नाही... तुमच्या घरी कोणी चोरी केली तरी त्याची तक्रार करायचा तुम्हाला अधिकार नाही... तुमच्या घराच्या खिडकीत तुमच्याच कडून हप्ता वसूल करून नाक्यावरच्या गुंडाने स्वतःच्या वाढदिवसाला फ्लेक्स लावला तरी तुम्हाला त्याला शिव्या घालायचा अधिकार नाही...आयुष्यभर प्रामाणिक राहूनही लाचखोरी केल्याबद्दल तुम्हालाच पोलिसांनी आत टाकले तरी त्याविरोधात बोलायचा अधिकार तुम्हाला नाही...दुधातल्या भेसळीमुळे तुमचेच पोरगे मेले तरी रडायचा तुम्हाला अधिकार नाही... धान्यापासून बनलेल्या दारूमुळे तुमचाच मुलगा वाया गेला तरी तुम्हाला त्याला रागवायचा अधिकार नाही... पेट्रोल मधल्या भेसळीमुळे तुमची दुचाकी खराब झाली तरी वैतागायचा तुम्हाला अधिकार नाही... राजकीय गुंडांनी तुमच्याच पोरीला उचलून नेले तरी त्याविरोधी चकार शब्द काढायचा तुम्हाला अधिकार नाही...

Wednesday, March 2, 2011

म्हणून...

'परिवर्तन' कशासाठी?
कोणीतरी विचारले -

हम दो हमारे दो,
चौकोनी कुटुंब
चौकटीतच राहिले,
म्हणून...

'आपण सामान्य' म्हणत
गुंड, पुंड, झुंडीला
घाबरले,
म्हणून...

राजकारण नको
म्हणणारे वाढले,
राजकारण करू
म्हणणारे 'काढले',
म्हणून...

'चलता है'
म्हणणारे वाढले,
'नहीं चलेगा'
म्हणणाऱ्यांना मारले,
म्हणून...

'खाणे' अगदी
नित्यनेमाचे झाले,
निमित्त काढून 'पिणे'
रोजचेच झाले.
खाण्यासाठी 'नोटा'
पिण्यासाठी 'धान्य'
सारे सोयीचे झाले,
म्हणून...

टू जी - थ्री जी
राष्ट्रकुल-बिष्ट्रकुल
'खेळ' केले,
म्हणून...

बदला म्हणून
बदल्या झाल्या,
इमानी लोक
शून्य उरले,
म्हणून...

वेळेला चहा लागतो,
वेळ साधण्यासाठी 'चहा पाणी'
सवयीचे झाले,
म्हणून...

इतिहास खोडून
नवा लिहिला,
भविष्यकाळ नव्याने
जुनाच लिहिला,
म्हणून...

'भाऊ' 'आबा'
'दादा' 'बाबा'
या सगळ्यांवर 'साहेब'
उदंड झाले,
म्हणून...

लढतो म्हणणारा
ठार झाला
उघडकीस आणणारा
गायब झाला
तरी सगळे गप्पच बसले,
बाकी जाऊ द्या हो, पण
षंढ थंड लोक पाहून
डोकेच फिरले,
म्हणून...

तन्मय कानिटकर
२५/०२/२०१०